उकाड्यापासून दिलासा, मात्र गारांमुळे नुकसानाची भीती
कणकवली (प्रतिनिधी) : दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून प्रचंड उकाडा आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला.
दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणांतच पावसाने जोर धरत मुसळधार स्वरूप धारण केले. यावेळी वाऱ्याचाही वेग वाढल्याने रस्त्यांवरील नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.
या पावसाबरोबर काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाल्याचे दिसून आले. गारांमुळे घराबाहेरील काचेच्या सजावटी वस्तूंना, खिडक्यांच्या काचा तसेच उभ्या असलेल्या वाहनांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्याची घाई केली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पिकांवर या पावसाचा काय परिणाम होईल, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. विशेषतः फळबागा आणि भाजीपाला पिकांना गारांचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागात पाण्याचे तळे साचल्याचेही चित्र पाहायला मिळाले. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अशाच स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













