कणकवली (प्रतिनिधी) : एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहेत.
मंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त नीतेश राणे महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी दिल्या पाहिजेत, असे सांगत या कामासाठी विभागाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यावरील ९१ अतिसंवेदनशील लँडींग पॉईंट्सवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नेमणे आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत ‘सागरमित्र’ नेमणुकीसंदर्भातही आढावा घेण्यात घेण्यात येऊन संबंधित यंत्रणांना याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.













