Breaking News

नांदगाव उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईट तातडीने लावा

नांदगाव, असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडल्या समस्या ; पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय , सुशोभीकरण करा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावरील नांदगाव परिसरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी नांदगाव व असलदे गावातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नांदगाव तिठ्यावर देवगड – निपाणी रस्त्याचा रहदारीचा नाका असताना गेले काही महिने काळोख कशाला ? याठिकाणी काळोखाचा फायदा घेवून काही चुकीची घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न पत्रकार भगवान लोके यांनी विचारला. तसेच उड्डाणपुलाखालील पर्यटक व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय, अतिक्रमण, वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तसेच परिसर सुशोभीकरणाबाबत नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांच्यासह ग्रामस्थांनी लक्ष वेधले.


नांदगाव तिठा येथे असलदे व नांदगाव गावातील महामार्गावरील समस्यांबाबत उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. यावेळी माजी सरपंच पंढरी वायंगणकर, दिलिप फोंडके, कमलाकर पाटील, प्रदीप हरमलकर, दयानंद हडकर, रघुनाथ लोके, शत्रुघ्न डामरे, बाळा सातोसे,बाळा मोरये, देवेंद्र लोके , राजू परब , बाळा लोके , सुरेश लोके , भाऊ काझी , संतोष डामरे , प्रवीण डगरे , पत्रकार ऋषिकेश मोरजकर , महेश लोके, श्री. पाटील , रामचंद्र जंगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदगाव उड्डाणपुलाखाली रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या काळोखामुळे अपघात झालेले आहेत. या उड्डाणपुलाखाली महिला लहान मुले रात्रीची ये-जा करत असतात , या अंधाराचा फायदा घेवून काही चुकीच्या घटना घडू शकतात. देवगड तालुक्याला जोडणारा हा महत्चाचा नाका असून अनेक वाहनचालक काळोख असल्यामुळे चुकीच्या मार्गावर जातात. त्यामुळे ठिकाणी तातडीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , भगवान लोके यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

तसेच उड्डाणपुलाच्या परिसरात वाढलेले अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात यावे. सर्व्हिस रस्ते अरुंद झालेले आहेत. त्याचा रितसर प्लान आणून मोजमाप करावे , जेणेकरुन माहिती होईल. कुठपर्यंत जागा आहे , याची माहिती नागरिकांना होईल. ओटव फाटा येथील स्ट्रीट लाईट बंद आहे. त्याठिकाणी मद्यपी लोक रस्त्यावरच काळोखाचा फायदा घेवून दारु पित बसतात. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी , अशी मागणी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी करत आपण नांदगाव तिठा येथील काळोखाचा प्रश्न मिटवण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने 4 हॅलोजन महामार्ग प्राधिकरणकडे उपलब्ध करुन दिले.

यावेळी नांदगाव व असलदे येथील ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांबाबत तातडीने उड्डाणपुलाखाली स्ट्रीट लाईटची व्यवस्था 2 दिवसांत करतो, तसेच अतिक्रमण हटाव व नामफलक लावण्याची कार्यवाही लवकरच केली जाईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता उमेश कुमावत यांनी दिली.