सावंतवाडी | कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने लढणार आहे. आतापर्यंतच्या भाषणाला माझं ‘मम्’ आहे. कमळ चिन्हाचा उमेदवार आपला असणार आहे. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा भाजपमय राहिलाय, तो यापुढेही राहील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलं. सावंतवाडी येथील विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज भाजप पक्ष कार्यालयाच आज उद्घाटन झालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले, भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून हे कार्यालय उभं राहिलं आहे. याचा उपयोग निवडणूकीसह जनसामान्यांना देखील होणार आहे. जन सुविधा कक्ष देखील इथे उभारण्यात आला आहे. याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले. आम्ही कुणाची जिरवण्यासाठी जमलो नसून विशाल परब यांनी उभं केलेल्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. येणारे दोन महिने जिद्दीने काम करावं लागेल. आपली रेष मोठी करण्याच काम करायचं आहे. दुसऱ्याची रेष पुसायच काम करायचं नाही. महाविकास आघाडीच सरकार मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असताना सगळे तुटून पडत होते. जेव्हा विकेट काढायची होती तेव्हा ती त्यांनी काढली. भाजपची ताकद असल्याने स्वबळासाठी कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यात काहीही चूक नाही. वर्षभार आपण कार्यक्रम करतो फक्त, निवडणूकीसाठी मैदानात उतरणारा हा पक्ष नाही. त्यामुळे स्वबळावर लढाव अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. भाजपच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकला नाही. आम्ही कोणाला डिवचल नाही. वातावरण खराब केलं नाही. ज्यांना मी नगराध्यक्ष केलं ते आता मला आव्हान देऊ लागलेत. विधानसभेला प्यार किया तो डरना क्या, आता हम आपके है कोन ? अशी परिस्थिती झालीय असा टोला हाणला.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के मतदान खासदार नारायण राणेंना झालं. रत्नागिरीतील परिस्थिती सर्वांना सर्वश्रुत आहे. अरे ला कारे करण्यात माझी पीएचडी आहे. अंगावर केसेस आहेत, आताच ३०७मधून दोषमुक्तता मिळाली. आम्हाला जनतेसाठी काम करायच आहे. कोणाची जिरवायच काम आम्हाला करायच नाही. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवणचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, सभापती एकाच विचारचे आहेत. त्यामुळे विकास कुणीही रोखू शकत नाही. सिंधुदुर्गात उबाठा शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांकडे उमेदवार शिल्लक नाहीत. आमची युती झाली तर कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. बंडखोरी रोखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विरोधकांना लायकीत ठेवायचं असून त्यांना रेडिमेड उमेदवार द्यायचे नाहीत. आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवून आम्ही नंतर एकच येणार आहोत. आमचे नेते एकत्र आणणारच आहेत. लोकसभा, विधानसभेची परिस्थिती वेगळी होती. युती करून बंडखोरी झाली तर परवडणार नाही. भाजपला थांबवण्यासाठी आपसात वाद लावण्याच काम होत आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता कमळ चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा, त्यासाठी काम करा. सरकारच्या योजना पोहचवण्यासाठी काम करत असलेल्या विशाल परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. जन सुविधा केंद्राचा लाभ लोकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला नंबर वन करण्यात आपण पुढे आहोत. जिल्ह्यातील दोन नंबर धंदे बंद झाले आहेत. हे होत असताना असंख्य माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देखील देत आहेत. कोणाला प्रवेश आवडेल कोणाला नाही आवडणार आहे. मात्र, पक्ष वाढत असल्यास ती स्वीकारली पाहिजे असे आवाहन करत प्रदेशाध्यक्षांची कॉलर टाईट करण्याची जबाबदारी आपली आहे. १०० टक्के निकाल लावून आपल्याला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. शतप्रतिशत भाजप जिल्ह्यात करून दाखवा अस आवाहन त्यांनी केलं.
विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत चारही नगरपरिषदेत भाजपला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सिंधुदुर्गात भाजपची अत्यंत चांगली स्थिती आहे. लोकसभा, विधानसभेला युती म्हणून काम करत मताधिक्य मिळवून दिलं. जिल्ह्यात भाजपन स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ही निवडणूक मोठ्या मताधिक्यान आपण जिंकू शकतो. त्यासाठी स्वबळावर लढण्याची अनुमती आम्हाला द्यावी, कामाला सुरुवात आम्ही केली आहे असे मत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले, निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही बांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली. दोनवेळा महायुतीतून लढलो. मात्र, कार्यकर्त्यांची निवडणूक स्वबळावर व्हावी अशी आहे अपेक्षा आहे. आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत.
प्रास्ताविकात विशाल परब म्हणाले आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आहेत. हे कार्यालय आपलं आहे. तुमच्यासाठी ते २४०७ खुलं आहे. ३ डिसेंबरला गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहे. फिजीशीयन रुग्णालयात सेवा देत आहे. जनसेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेण्यात आले. यामध्ये उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, कुडाळ शिवसेनेचे रुपेश पावसकर, मालवणचे शुभम मठकर तसेच रोणापाल, माडखोल येथील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.













