जानवली येथे दुचाकी आणि कारचा अपघात; पती-पत्नी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल नीलम कंट्री साईड हॉटेलसमोर आज दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व इर्टिगा कार यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. लोरे (ता. कणकवली) येथील सुभाष नारायण गुरव (वय ५४) हे टाटा शोरूम येथून हिरो होंडा पॅशन प्रो या दुचाकीला एचएसआरपी नंबर प्लेट बसवून नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रस्ता ओलांडत होते. दरम्यान, नांदगावहून कणकवलीकडे येणाऱ्या इर्टीगा कारचा चालक कमलेश रामचंद्र नरे (४५, रा. कलमठ) यांची कार या दुचाकीला धडकली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील सुभाष गुरव यांच्या पत्नी संजीवनी सुभाष गुरव (५२) या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले. सुभाष गुरव यांनाही उजव्या पायाला गुडघ्यात, हाताला आणि खांद्याला दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण आणि सुधीर धारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाई सुरू होती.