प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय कायम
देवगड (प्रतिनिधी): देवगड-निपाणी महामार्ग हा कोकणाला कोल्हापूरशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या महामार्गावरील असलदे डांबरेवाडीच्या तीव्र वळणावर रस्ता खचल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले असून डांबराचा थर निघून गेलेला आहे. त्यामुळे वळण घेताना वाहनांचा तोल जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणचा रस्ता अनेकदा दुरुस्तीच्या आश्वासनावरच अडकून पडला आहे. प्रत्येक पावसाळ्यानंतर रस्ता अधिक खचत चालला आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
दररोज या मार्गावरून देवगड, कुडाळ, निपाणी, विजयदुर्ग आणि वैभववाडी दिशेने शेकडो वाहने धावतात. त्यामुळे या भागात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित दुरुस्ती करून प्रवास सुरळीत व सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.












