सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे – वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : मी ठामपणे शिवसेना पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे जिल्हाप्रमुख पद स्विकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या जबाबदारीला ताकद देण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. हि जबाबदारी आपल्याला समर्थपणे पार पाडायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. एका दिवसात संघटना वाढणार नाही परंतु प्रत्येक दिवस थोडे थोडे प्रयत्न केल्यावर नक्कीच संघटना वाढेल. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे एखाद्या प्रश्नावर आंदोलन केले तरी आदोलकांवर गुन्हे दाखल केले जातात मात्र सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला घाबरून चालणार नाही संघर्ष केला पाहिजे.

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे. आणि या संघर्षात मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आज कणकवली विजय भवन येथे जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ! वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. जेष्ठ शिवसैनिक आबू पटेल म्हणाले, उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी योग्य नेतृत्व
दिले आहे. आता सर्वांनी संघटना वाढविण्यासाठी जोमाने काम केले पाहिजे. निष्ठा आणि क्रियाशीलता असणारे नवीन पदाधिकारी नेमले पाहिजेत. आणि त्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले पाहिजे, लोक आपल्याकडे येण्यापेक्षा लोकांपर्यत आपण पोहोचले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

जेष्ठ शिवसैनिक जयसिंग नाईक म्हणाले, भाजपा पक्ष लोकांना लुटत आहे, लोकांचे शोषण करत आहे. पैशाच्या जीवावर सत्ता मिळविली जात आहे. विरोधी पक्ष म्हणून आपण त्याला ठामपणे विरोध केला पाहिजे आणि पक्ष कार्यात वैभव नाईक यांना आपण खंबीर पणे साथ दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. लवकरच याचा उद्रेक होणार असून सत्ता परिवर्तन होणार आहे. यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलने करून गावागावात शिवसेना वाढविली पाहिजे. शिवसेनेच्या माध्यमातून समाजपयोगी विविध कार्यक्रम राबविले पाहिजेत त्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू असे सांगितले. महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव म्हणाल्या, वैभव नाईक यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आले होते. परंतु उद्धवजींनी त्यांना जिल्हाप्रमुख पद देऊन संघटनेची जबाबदारी दिली. वैभव नाईक यांनी नाराज न होता उद्धवजींचा आदेश पाळला हीच खऱ्या शिवसैनिकाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत म्हणाले, जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची वैभव नाईक यांची पद्धत आहे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे हात बळकट करूया असे सांगितले. यावेळी संदीप कदम, सुजित जाधव, सुधीर गांधी व अन्य शिवसैनिकांनी आपले विचार व्यक्त करत वैभव नाईक यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, युवासेना समन्वयक गीतेश कडू, कन्हैया पारकर, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, ऍड. हर्षद गावडे, महेश कोदे, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते, प्रतीक्षा अवसरे, अ. रा. सावंत, विजय राणे, तेजस राणे, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, सिद्धेश राणे, अनंत राणे, रोहित राणे, ललित घाडीगावकर, प्रमोद कावले, मुरलीधर परब, तात्या निकम, नंदू परब, बाळा नाईक, अनिल नरे, साचीन लोके, लक्ष्मण लोके, संदीप राणे, वैभव सावंत, अजय जाधव, अजित काणेकर, गुरुनाथ पेडणेकर, नितेश भोगले, चेतन हुले, सुरेश सुतार, बाळा राऊत, संदीप गावकर, विशाल येंडे, वेदांत पालव, सिद्धेश कारेकर, विराज येंडे, नंदकिशोर भिसे, मधुकर वळंजू, किशोर कोरगावकर, शाम भोवड, संदीप वारंग, विठोबा हुले आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.